Pundalik Samachar

लाभार्थीची गैरसोय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी - आमदार समाधान आवताडे

पंढरपूर, (उमाका):- शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक लाभार्थींना प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधांची माहिती द्यावी. एकाही लाभार्थीची गैरसोय होणार नाही याबाबत प्रशासनाने योग्य ती दक्षता घेवून नियोजन करावे असे, आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.

शासन आपल्या दारी उपक्रमाबाबत पुर्व नियोजन आढावा बैठक प्रांताधिकारी कार्यालय पंढरपूर येथे घेण्यात आली. बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, अपर तहसिलदार तुषार शिंदे, पोलीस निरिक्षक मिलींद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर तसेच संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.




शासन आपल्या दारी अभियानातर्गंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित 26 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजित असून, तालुक्यातील प्रत्येक विभागाचे अधिकारी यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार नियोजन करावे. मुख्यमंत्र्यी महोदयांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी पार्किंग, भोजन व पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था ठेवावी, आरोग्यसुविधा उपलब्ध ठेवावी. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांचा ही समावेश करण्यात यावा. पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे व पार्किंगचे योग्य नियोजन करावे प्रशासनाने सर्व जबाबदारी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडावी. असे आमदार आवताडे यांनी यावेळी सांगितले

राज्य शासनाने शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. तालुक्यातील विविध यंत्रणांनी या उपक्रमासाठी नियोजनपूर्वक काम करावे. तालुक्यातील कोणताही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहणार आहे. लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी लाभार्थ्यांची निवड करून त्यांच्या गावनिहाय लाभार्थ्यांची यादी तयार करावी अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post